कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर शहराला पुराचा धोका वाढला असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होवू शकतो. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढून पूर येण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणातून पाणी सोडल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.पुणे-बेंगळुरू महामार्गावरील शिरोली येथील सर्व्हिस रोडवर पुराचे पाणी पोहोचले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास महामार्गावर पाणी येऊ शकते. पुरामुळे 2019 मध्ये 8 दिवस आणि 2021 मध्ये 4 दिवस पुणे-बेंगळुरू महामार्ग बंद होता.
२०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात पूराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतरण प्रक्रिया सुरु केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरबाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आवाहन केले आहे.