देशातील ऊस क्षेत्रात तब्बल २.६६ लाख हेक्टरने वाढ

कोल्हापूर : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 28 जुलै 2023 पर्यंतच्या खरीप पेरण्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊस आणि भात पिकाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. देशात खरीप पिकांच्या पेरणीने एकूण 830 लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे. भात क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 233.25 लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे 4.33 लाख हेक्‍टरची वाढ झाली असून, यंदा एकूण 237.58 लाख हेक्‍टरवर भातपीक झाली आहे. यंदा उसाच्या क्षेत्रात २.६६ लाख हेक्टरने वाढ झाली आहे.

देशातील खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी ७६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत १.३४ लाख हेक्टरने कमी आहे. देशात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र १०९१.७३ लाख हेक्टर असून, त्यापैकी 830.31 लाख हेक्‍टरवर पूर्ण पेरण्या झाल्या आहेत. तृणधान्ये, भरड तृणधान्ये आणि तेलबियांची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाली आहे, तर कडधान्याची पेरणी मागे पडली आहे. कडधान्याचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत 12.32 लाख हेक्‍टरने कमी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागण झाली असून, यंदा ५६ लाख हेक्टरवर उसाची लागण झाली आहे. गेल्यावर्षी २८ जुलैपर्यंत केवळ ५३.३४ लाख हेक्टरवर लागण झाली होती. भुईमूगाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या 38.59 लाख हेक्टरच्या तब्बल 1 लाख हेक्टरने घटून यंदा 37.58 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र 115.63 लाख हेक्टरवरून 119.91 लाख हेक्टर झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here