हापूर : पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात उसाचे जादा उत्पादन होते. येथील शेतकरी आपल्या शेतात हजारो टन ऊस पिकवतात. जिल्ह्यात दोन साखर कारखाने आहेत. शेतकरी आपला ऊस विकून चांगला नफा कमावतात. मात्र, यंदा शेतकऱ्यांना ऊस पिकात टॉप बोअर रोगाची भीती सतावत आहे. ही कीड शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरली आहे. शेतकऱ्यांची पिके खराब होत असून उत्पादनावरही परिणाम होत आहे.
न्यूज १८ मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हापूर जिल्ह्याचे कृषी तज्ज्ञ कुशलवीर सिंग यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यानंतर टॉप बोरर कीड शेतकऱ्यांना अधिक त्रास देते. या रोगामुळे उसाच्या वरच्या भागाची नासाडी होते. किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या वरची पाने पांढरी पडतात. यापासून बचावासाठी १२ किलो कार्बोफ्युरन ३ जी प्रती एकर वापरावे असा सल्ला त्यांनी दिला.
हापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर शेतकरी ऊस पिक घेतात. जिल्ह्यातच दोन साखर कारखाने असल्याने शेतकरी आपला ऊस सहजपणे त्यांना पुरवठा करू शकतात. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी शासनाकडून सहकार्य मिळते. कारखान्याच्या कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.