बेळगाव : वातावरणातील बदलांमुळे ऊस उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादनवाढीवर भर द्यावा, असे प्रतिपादन वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संशोधक सुरेश माने-पाटील यांनी केले. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यातर्फे मराठा मंदिर येथे आयोजित ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
माने-पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यामुळे महाराष्ट्रात सरासरी प्रति एकर उसाचे उत्पादन कमी मिळते. देशभरात प्रति एकर उसाचे सर्वाधिक उत्पादन तामिळनाडूमध्ये होते. कर्नाटकामध्ये प्रति एकर ३४ ते ३५ टन उसाचे उत्पादन होते. मात्र, चंदगड, तुर्केवाडी, हिटणी आदी भागातील शेतकऱ्यांनी प्रति एकर ७० ते १०० टनापर्यंत उसाचे उत्पादन घेतले आहे. बेळगाव परिसरातील वातावरण ऊस उत्पादनासाठी पोषक आहे
यावेळी आर. के. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, संचालक आर. आय. पाटील, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे नूतन संचालक तानाजी पाटील, संचालक जोतिबा आंबोळकर, शिवाजी कुट्रे, सिद्धाप्पा टुमरी, बसवंत मायाण्णाचे, लक्ष्मण नाईक, बाळासाहेब भेकणे, सुनील अष्टेकर, बसवराज गाणिगेर, वनिता अगसंगेकर, वसुधा म्हाळोजी, तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका म. ए. समितीचे सचिव अॅड. एम. जी. पाटील, युवराज हुलजी, भाऊराव पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे उपस्थित होते.