बुलढाणा : संत चोडासागर प्रकल्प परिसराच्या कार्यक्षेत्रात व बॅकवॉटर झोनमध्ये जिजामाता साखर कारखान्याच्या संचालकांनी ऊस पाहणी दौऱ्यास ५ सप्टेंबरपासून सुरुवात केली. कारखान्याचा गाळप हंगाम डिसेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.जिजामाता साखर कारखाना मागील २३ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पूर्व हंगामी ऊस लागवड जास्तीत जास्त करण्याचे कारखान्याचे नियोजन असल्याचे संचालक गणेशराव राजे जाधव यांनी सांगितले. पुढील हंगामासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर कस लागवड करणार असल्याची माहिती व्यवस्थापक अनंत बावणे यांनी दिली.
मागील महिन्यात अहमदनगर येथील व्यंकटेश शुगर्स इंडस्ट्रीज लिमिटेडला जिजामाता साखर कारखान्याचा ताबा देण्यात आला. त्यानंतर तातडीने कारखाना दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. कारखाना सुरु होणार असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कारखान्याला गाळप हंगाम सुरू करण्यासाठी पुरेशा उसाची आवश्यकता भासणार आहे. त्यानुषंगाने खडकपुर्णा नदीकाठच्या गावांमध्ये कारखाना संचालकांनी ऊस पाहणी केली. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे. यावेळी कृषी अधिकारी गजानन आघाव, सुपरवायझर सुरेश निलख व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.