नांदेड : यंदा नांदेड विभागात उसाचे नवीन लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे साखर उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. गेल्यावर्षी नांदेड विभागातील ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप केले. यंदा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावर्षी नवीन ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने साखर उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऊस गाळपासाठी अर्ज केलेल्या ३१ कारखान्यांपैकी ३० कारखान्यांनी गाळप केले. या कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६५ हजार ७७८ मे. टन ऊसाचे गाळप केले. त्यातून १ कोटी ६ लाख ७९ हजार ६४१ मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्के इतका राहिला होता. विभागातील नांदेड जिल्ह्यात ६, लातुर जिल्ह्यात सर्वाधिक १२, परभणी विभागात ७ तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ५ असे ३० सहकारी साखर कारखाने आहेत.
उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. उसाला पाणीही जास्त लागते. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरविल्याचे दिसते. नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांत ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. नांदेड जिल्ह्यात २२ हजार ३०३ हेक्टरपैकी प्रत्यक्ष ऊस लागवड ११ टक्के म्हणजे २३६२ हेक्टर, ११ टक्के आहे. परभणीत प्रत्यक्ष ऊस लागवड क्षेत्र ११ हजार ४३४ हेक्टर आहे.