नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत दिवसेंदिवस आपली कामगिरी उंचावत आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताकडून नेमबाजीच्या वैयक्तिक पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्सच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकले. दुसरीकडे महिला स्क्वॉश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंगने वैयक्तिक पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्सच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकले. चीनच्या लिन्सूने विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. भारताचा स्वप्नील सुरेश बराच काळ पहिल्या स्थानावर राहिला, मात्र शेवटच्या क्षणांमध्ये तो मागे पडला. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा 3-0 असा पराभव करत 37 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून इतिहास रचला.
भारतीय महिला स्क्वॉश संघाला उपांत्य फेरीत हाँगकाँगविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. गुरुवारी भारताला नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला संघाने रौप्यपदक जिंकले. जे सहाव्या दिवशी भारताचे पहिले पदक होते. यानंतर, पुरुष संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि ५० मीटर 3P मध्ये सुवर्णपदक जिंकले. स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शेओरन यांच्या पुरुष संघाने ५० मीटर रायफल ३पी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. ईशा, दिव्या आणि पलक या महिला सांघिक त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशासाठी रौप्यपदक जिंकले.