कोल्हापूर : आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असतानाही भोगावती साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार ऊस दर दिला आहे. प्रतिवर्षी ५ ते ६ कोटींच्या कर्जाची रक्कम कमी केली असून, जिल्हा बँकेच्या कर्जाचा व्याजदर १५ ऐवजी कमी करून ११ टक्क्यांवर आणला आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक व काटकसरीने केल्याचा दावा ‘भोगावती’चे अध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांनी केला. भोगावती कारखान्याच्या वार्षिक सभेवेळी आ. पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
विषय पत्रिका वाचन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले. कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांच्या नावावर बँक ऑफ इंडियाचे बारा कोटींचे कर्ज कारखान्यासाठी उचलले आहे. त्यांच्या नावावरचे कर्ज फेडा, सडोलीचे नाव होऊ दे, असे पी. एन. यांना अशोकराव पवार यांनी सांगितले. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आ. पी. एन. पाटील यांनी दिले. यावेळी सदाशिवराव चरापले, जनार्दन पाटील, पी. डी. चौगले, केरबाभाऊ पाटील, बी. के. डोंगळे, धैर्यशील पाटील-कौलवकर, हंबीरराव पाटील, संतोष पोर्लेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ‘भोगावती’च्या साखर विक्रीबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात येणारे अब्रुनुकसानीचे दावे मागे घेत असल्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी जाहीर केले. सभेत माजी संचालकासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.