कोल्हापूर : पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आर्थिक संकटात आहेत. या कारखान्यांना कर्जफेडीची चिंता सतावत आहे. भोगावती, कुंभी, आजरा आणि गडहिंग्लज या कारखान्यांना गळीत हंगामाबरोबरच बिकट आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने नेहमी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला आणि वेळेवर दर देतात. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीच्या उसाला प्रती टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीकडे पाहता आधीच कर्जाचा डोंगर असलेले कारखाने हा तिढा कसा सोडवणार असा प्रश्न आहे. सद्यस्थितीत काँग्रेसचे नेते, आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली असलेल्या भोगावती साखर कारखान्यावर सुमारे ३७० कोटींचे कर्ज आहे असा आरोप करण्यात आले आहे.
दरम्यान, कुंभी सहकारी साखर कारखान्यावर ३०० कोटींचे कर्ज झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या दोन कारखान्यांसह गडहिंग्लज व आजरा साखर कारखाने सुरू करणे हे संचालक मंडळासमोर आव्हान आहे. आजरा कारखान्यावर २०० कोटी रुपयांचा बोजा आहे. भाडेतत्त्वावर दिलेला गडहिंग्लज कारखान्याचा करार मुदतीआधीच संबंधितांनी सोडला. या कारखान्याकडेही ७० कोटींचा तोटा, ७० कोटींची देणी आहेत असा आरोप झाला आहे. मात्र या कारखान्यांचे हंगाम सुरू होणे हे आव्हानच ठरणार आहे.