कोल्हापूर : दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे सध्या १०६ हंगामी कामगार आहेत. २०१९ पासून आजपर्यंत यातील एकाही कामगाराला सेवेत कायम केलेले नाही. २०१९ पासून आजपर्यंत एकाही हंगामी कामगाराला सेवेत कायम न करता बाहेरील २०० ते २५० कामगार कारखान्यात भरलेले आहेत. त्यामुळे या १०६ हंगामी कामगारांवर अन्याय झाला आहे, असा आरोप चंदगड तालुका साखर कामगार युनियन (सीटू) ने केला आहे. युनियनने कारखान्याच्या हंगामी कामगारांना कायम करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली आहे.
कामगार संघटनेने याबाबत ‘दौलत’चे मार्गदर्शक गोपाळराव पाटील व उपाध्यक्ष संजय पाटील यांना निवेदन दिले आहे. हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली आहे. व्यवस्थापनाने नवीन २५० कामगार कारखान्यात भरल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. संघटनेमार्फत दौलत कारखान्याच्या व्यवस्थापन कमिटीला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. पांडुरंग रेडेकर, संजय राऊत, संजय गोरल, उत्तम होनगेकर, संजय देसाई, एकनाथ कुट्रे, गजानन कुंभार आदींनी हे निवेदन दिले.