कोल्हापूर : सातार्डे (ता. करवीर) येथील श्री कृष्ण ॲग्री डायट कंपनी या गूळ पावडर निर्मिती कारखान्याने गेल्यावर्षीच्या उसाला अतिरिक्त प्रति टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, यंदाच्या उसाची पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा कारखाना सुरू करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक के. एस चौगुले यांना निवेदन देण्यात आले.
श्री कृष्ण ॲग्रो डायटने पहिल्या उचलीची घोषणा न करता यंदा गळीत हंगाम सुरू केला आहे. गेल्या वर्षीच्या उसाला अतिरिक्त प्रति टन ४०० रुपयेचा हप्ता दिलेला नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना संस्थापक अध्यक्षांची भेट घेवून या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय कारखाना सुरू ठेवण्यास विरोध केला. तशा मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे दगडू गुरवळ, विक्रम पाटील, रामभाऊ चेचर, महादेव झेंडे, गुंडा पाटील, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, कुंडलिक पाटील, कृष्णाजी कोठावळे, धनाजी बोरगे, यशवंत पाटील व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, कंपनीत काटामारी होत असल्याचा आरोप शेतकरी धनाजी बोरगे यांनी केला.