पुणे : अखेर राज्यातील ऊस गाळप हंगाम कधी सुरु करायचा, याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती बैठकीला मुहूर्त सापडला आहे. राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंगळवारी (दि. १७) निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा १४ लाख ७ हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून १ हजार २२ लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातील ९० टक्के ऊस गाळपास आल्यास एकूण ९२१ लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. त्यातून सव्वा अकरा टक्के साखर उतारा अपेक्षित धरल्यास १०३.५८ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. इथेनॉलकरिता १५ लाख टन साखर वळविल्यास व संभाव्य निव्वळ साखर उतारा दहा टक्के गृहीत धरल्यास राज्यात यंदा ८८.५८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८७ हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.