कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शाहूनगर-परिते येथील श्री भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहे. त्यानंतर सायंकाळपासून वैयक्तिक गाठीभेटी आणि गुप्त प्रचाराला धार येणार आहे. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) मतदान होणार आहे. संचालकांच्या २५ जागांसाठी तिरंगी लढत होत असून, ८१ उमेदवार रिंगणात आहेत.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भोगावती परिसरात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. आठवडाभर भोगावती परिसरातील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या रिंगणातील तिन्ही आघाड्या परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी, माजी चेअरमन धैर्यशील पाटील- कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील दादासाहेब पाटील-कौलवकर पॅनेल आणि सदाशिव चरापले, हंबीरराव पाटील व डॉ. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिव-शाहू परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे.