साखर कारखान्यांना लवकरच इथेनॉल पंप बसवण्याची परवानगी मिळणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : भारतात इथेनॉल उत्पादन आणि वापराला गती देण्यासाठी, ग्राहकांना जैवइंधन सहज उपलब्ध व्हावा यासाठी साखर कारखान्यांना लवकरच इथेनॉल पंप उभारण्याची परवानगी दिली जाईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग असेल. नवी दिल्ली येथे ‘चिनीमंडी’ आयोजित चौथ्या साखर-इथेनॉल आणि बायो-एनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC) २०२५ ला संबोधित करताना केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते.

ते म्हणाले की, साखर उद्योगात जीडीपीमध्ये सध्याच्या १-१.१५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची क्षमता आहे. त्यांनी प्रति एकर ऊस उत्पादन वाढवण्याच्या गरजेवरही भर दिला. इथेनॉलला आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीचा प्रमुख चालक असल्याचे सांगत गडकरी यांनी या क्षेत्रात नावीन्यपूर्णता, विविधीकरणाच्या गरजेवर भर दिला. मंत्री गडकरी म्हणाले की, सरकारने इथेनॉल मिश्रणाला गती दिली आहे. २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २०३० पर्यंत नेण्याऐवजी ते २०२५-२६ पर्यंत आणण्यात आले आहे. त्यामुळेच डिसेंबर २०२४ पर्यंत इथेनॉल मिश्रण १९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

ते म्हणाले, इथेनॉल उत्पादनाला पाठिंबा देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) ईएसवाय २०२४-२५ साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी (ओएमसी) इथेनॉल खरेदी किमतीमधील सुधारणांना मान्यता दिली आहे. सी-हेवी मोलॅसेसपासून बनवलेल्या इथेनॉलची प्रशासित एक्स-मिल किंमत १.३९ रुपयांनी वाढवून ५७.९७ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी किंमत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.

गडकरी यांनी इंधन मिश्रणाच्या पलीकडे इथेनॉलची क्षमता अधोरेखित केली. रस्ते बांधकामासाठी इथेनॉलपासून बिटुमेन विकसित करण्याच्या योजनांवर प्रकाश टाकला. त्यांनी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी पुढाकारांची घोषणा केली आणि फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी सरकारची वचनबद्धता पुन्हा सांगितली. स्वच्छ ऊर्जेवर भर देत, मंत्र्यांनी बायो-कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) पासून हायड्रोजन उत्पादन आणि जैव विमान इंधनाच्या विकासाबद्दल भाष्य केले. त्यामुळे साखर उद्योग भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणात एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळवू शकेल, असे ते म्हणाले. याशिवाय, त्यांनी उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी ऊस लागवडीचे आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवरही भर दिला. शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रोन आणि नॅनो खतांचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here