नवी दिल्ली : देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिनीमंडी’तर्फे आयोजित शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी इंडिया कॉन्फ्रेंस (SEIC 2025) मध्ये टाकळीवाडी (ता.शिरोळ)येथील श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांना शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी (Sugar-Ethanol & Bioenergy International Award / SEIA 2025) या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलीवूड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते चेअरमन माधवराव घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माधवराव घाटगे यांनी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबद्दल हा गौरव करण्यात आला. यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे हेदेखील उपस्थित होते.
शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी इंडिया कॉन्फ्रेंस (SEIC 2025) मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याने शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ व २०२४ च्या महापुरात १० हजार पूरग्रस्त व ५ हजार जनावरांना स्व:खर्चाने छावणी उभारून हजारो पूरग्रस्तांना आधार दिला. कोरोना काळात पाच हजार ऊसतोडणी मजूर, शिरोळ तालुक्यातील एक हजार रिक्षाचालक व जोतिबा डोंगरावरील एक हजार पुजारी यांना महिनाभर पुरेल इतके जीवनाश्यक साहित्य वाटप केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून घाटगे कार्यरत आहेत. याबाबत चेअरमन घाटगे म्हणाले की, महाराष्ट्राच्या साखर उद्योग पटलावर गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे समीकरण तयार झाले आहे.