नांदेड : नांदेड विभागातील दोन कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून एकूण २९ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये सहभाग घेतला. यात १९ खासगी तर १० सहकारी साखर करण्याचा समावेश होता. आजअखेर या कारखान्यांनी ७३ लाख ९४ हजार ८७९ टन उसाचे गाळप तर ६८ लाख ९२ हजार ६०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. बंद कारखान्यांमध्ये लातूरमधील विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना लातूर व शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी (ओसा) यांचा समावेश आहे.
दरवर्षी परभणीतील गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि. हा खासगी साखर कारखाना गाळपात अग्रेसर राहतो. परंतु यंदा मात्र ट्वेंटीवन शुगर्स या कारखान्याने आजपर्यंत पाच लाख ६९ हजार टन गाळप करून विभागामध्ये आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानी ट्वेंटीवन शुगर्स माळवटी लातूर या कारखान्याने पाच लाख १५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या गंगाखेड शुगर्स या कारखान्याने चार लाख ९३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दरम्यान, विभागाचा सरासरी साखर उतारा ९.३२ टक्के असल्याची माहिती मिळाली. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. तसा कारखान्यांचे गाळपही कमी होत आहे.