महाराष्ट्र – थकित ‘एफआरपी’बाबत एका आठवड्यात निर्णय न घेतल्यास साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा : राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सात हजार कोटी रुपयांची एफआरपी थकविली गेली आहे. याबाबत एका आठवड्यात निर्णय न घेतल्यास साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा आणला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना दिला आहे. शेट्टी यांनी मंगळवारी (ता.२५) साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, स्वस्तिक पाटील, संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.

एकरकमी एफआरपी देण्याबाबत उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालाची प्रत आयुक्तांना देत शेट्टी म्हणाले, रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) थकित रक्कम केवळ २३४९ कोटी रुपये असल्याची चुकीची आकडेवारी सादर केली जात आहे. थकित रकमेचा आकडा सात हजार कोटींचा आहे. त्यामुळे साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्राची (आरआरसी) कारवाई करीत शेतकऱ्यांना व्याजासह रकमा अदा कराव्यात. थकित एफआरपी देताना १५ टक्के व्याज द्यावे व सर्व साखर कारखान्यांचे सरकारी लेखापरीक्षकांकडून लेखा परीक्षण करावे, अशी मागणी करीत शेट्टी यांनी काटामारी, उतारा चोरी याकडेही आयुक्तांचे लक्ष वेधले. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करावेत. तोडणी वाहतुकीचा खर्च अचूक अंतरानुसार लावावा,अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here