महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा केळी लागवडीकडे कल, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील चित्र

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता उसाच्या पिकाऐवजी केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील या तालुक्यांमध्ये केळीच्या पिकाची लागवड वाढली आहे. इंदापूरमधील पळसदेव, चांडगाव, अगोती, वरकुटे, कालठण, पडस्थळ, शिरसोडी, माळवाडी, तर करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे, टाकळी, पोमलवाडी, खातगाव, कुगाव, चिकलठाण या गावांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. ऊस पीक तयार होऊन गाळपास लागणारा कालावधी आणि गाळप होऊन प्रत्यक्ष हातात पैसे येण्यासाठी जास्त दिवस लागतात. तुलनेत केळी पिकाचे पैसे लवकर मिळतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

करमाळा तालुक्यात अनेक कारखाने बंद असल्याने तालुक्याबाहेरील खासगी किंवा सहकारी साखर कारखान्यांची मनधरणी करून ऊस गाळपासाठी आणावा लागतो. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जी- नऊ जातीची केळी लागवड करण्यात आली होती. त्यापासून उत्पादकांना फायदा झाला. त्यानंतर धरणाच्या दोन्ही बाजूला इंदापूर व करमाळा भागात केळी पिकाचे क्षेत्र वाढले. साखरपट्ट्यात केळी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यावर्षी अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना फटका बसला आहे. शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत. गेल्या हंगामात केळीला प्रति किलो ३३ रुपये उच्चांकी दर मिळाला होता. सध्या केळीला २१ रुपये दर मिळत असला, तरी यापुढे दरात सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. याशिवाय केळी पिकात कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची आदी आंतरपिके घेतली जात आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here