कर्नाल : भारतीय किसान युनियनच्या (चारुनी) नेत्यांनी राज्य समर्थन मुल्यामध्ये (एसएपी) वाढीसाठी सुरू केलेले आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी हरियाणातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप पुन्हा सुरू झाले आहे. आपल्या मागण्यांबाबत बिकेयूने गेल्या एक आठवड्यापासून आंदोलन सुरू केले होते. गाळप बंद झाल्याने हंगामात हजारो कामगार बेरोजगार झालेले पाहून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बिकेयू चारुनीचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी कुरुक्षेत्र मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारकडून जाहीर केलेली १० रुपयांची दरवाढ समाधानकारक नाही. मात्र, बेरोजगार कामगारांची स्थिती पाहता, आम्ही विरोधी आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मु्ख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी ऊसाच्या एसएपीमध्ये १० रुपये प्रती क्विंटल वाढीची घोषणा केली होती. अशा प्रकार एसएपी ३७२ रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
उसाची एसएपी वाढवून ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करताना, शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात वारंवार आंदोलने आणि मोर्चे काढले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी- जननायक जनता पार्टीच्या सरकारवर शेतकऱ्यांचे जीवन दयनीय बनविल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, प्रत्येक हक्काच्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे. रोहटकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हुड्डा म्हणाले की, राज्य सरकारने उसाच्या दरात सुचविलेल्या दरापैकी फक्त १० रुपयांची वाढ देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे.
हुड्डा म्हणाले की, काँग्रेसच्या सत्तेच्या काळात उसाच्या दरात १६५ टक्क्यांची वाढ झाली होती. आमच्या सरकारच्या कार्यकाळात हरियाणातील शेतकऱ्यांना सर्वाधिक दर दिला जात होता. आज, हरियाणातील शेतकऱ्यांना पंजाबच्या बरोबरीनेही दर मिळत नाही.