अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा होता. मात्र काहीं जण जणू काही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अशा प्रकारे कारभार करत आहेत. तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आ. अमोल खताळ यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीमध्ये केली.
आ. खताळ म्हणाले, कारखान्याची निवडणूक नुसती लढवायची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण मतदार, सभासदांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहोत. निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आ. खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, वैद्यकीय विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ अशोक इथापे, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शेतकरी नेते संतोष रोहोम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठलराव घोरपडे, तालुकाप्रमुख रमेश काळे, भाजप सरचिटणीस रोहिदास साबळे, संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड संग्राम जोधळे, अॅड. गोरक्ष कापकर, यांच्यासह सभासद उपस्थित होते.