महाराष्ट्रात ऊस शेतींसाठी ‘एआय’चा होणार वापर, ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत कृतिगट स्थापन करण्याचा निर्णय

पुणे : राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासाठी ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाच्या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीच्या खर्चात कपात होऊन उत्पादन क्षमता वाढते. देशातील घटलेले साखर उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्याच्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा विस्तार होण्यासाठी कृतिगटाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाने घेतला आहे.

‘व्हीएसआय’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. याप्रसंगी प्रतापराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डॉ. इंद्रजित मोहिते, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, विवेक कोल्हे आणि संस्थेचे महासंचालक संभाजी कडू- पाटील उपस्थित होते. या बैठकीत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने सादरीकरण केले. त्यावरील चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला.

बारामती कृषी विज्ञान केंद्राने यशस्वी प्रयोग केले आहेत. केंद्राकडे उपलब्ध असलेल्या माहितीद्वारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. केवळ ऊस शेती डोळ्यासमोर ठेवून एआयचा वापर करायचा नाही तर इतर पिकांसाठीही तो फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा बैठकीत झाली. ऊस पिकांच्या उत्पादनवाढीसह साखर कारखान्यांमध्येही एआयचा वापर केला जाणार आहे. गाळप हंगाम लवकर आटोपल्याने साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. एआय तंत्र राज्यभर नेमक्या कशा पद्धतीने न्यावे व त्यात साखर कारखान्यांची भूमिका निश्चितपणे कशी असावी, याविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी ‘व्हीएसआय’ने या कृती गटावर सोपविली आहे.

जयंत पाटलांकडे कृती गटाची जबाबदारी…

कृतिगटाचे प्रमुख म्हणून जयंत पाटील यांच्याकडे तर समन्वयक म्हणून शिवाजीराव देशमुख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृती गटाची बैठक होत असून, त्यानंतर ऊसशेतीमधील विस्ताराची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. कृती गटामध्ये जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, खासदार विशाल पाटील, इंद्रजित मोहिते, आमदार विश्वजित कदम यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे प्रतापराव पवार यांचा समावेश कृतिगटात केला आहे.

एआय तंत्राचा वापर करावाच लागेल : उपमुख्यमंत्री पवार

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ऊस शेतीत एआय तंत्राचा अवलंब करण्याबाबत चर्चा केली. यावेळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त समितीने काही मुद्दे मांडले. या तंत्राचा वापर साखर उद्योगाला करावाच लागेल. बैठकीत या तंत्राचा प्रसार राज्यभर कसा करता येईल. कोणत्या वाणांची निवड करावी, निविष्ठा व पाण्याची बचत कशी करता येईल. त्यातून उसाची उत्पादकता कशी वाढवता येईल, याविषयी चर्चा झाली.

एक हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

आगामी काळात ऊस क्षेत्र वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या क्षेत्रामध्ये चांगले आणि दर्जेदार पीक कसे घेता येईल, यादृष्टीने उपाय सुचविण्यात आले. बारामतीत एक हजार शेतकऱ्यांना एआयच्या मदतीने ऊस शेती प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये उसाची लागवड, पाणी देणे अशा विविध बाबतींत अचूकता आली आहे. हा प्रयोग राज्यभर राबवून आगामी काळात राज्यातील ऊस उत्पादन वाढविणे शक्य असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here