लखनौ : उत्तर प्रदेशमधील दरवेळच्या निवडणुकीत साखर उद्योग केंद्रस्थानी असतो. आताही निवडणुकीपूर्वी राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टीच्या सरकारांनी भ्रष्टाचार करत साखर कारखान्यांना आपापल्या साथिदारांत वाटून घेतले होते असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. शहा यांनी इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका समारंभात १५५ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या २८ गोदामे, बँक मुख्यालय भवन आणि उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या २३ नव्या शाखांचे उद्घाटन केले.
ते म्हणाले, एकेकाळी मायावती आणि अखिलेश यांनी साखर कारखाने बंद पाडले होते. त्यांची आपल्या साथीदारांना विक्री केली. हे कारखाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सुरू केले आहेत. मंत्री शहा यांनी सांगितले की, सहकार विभाग युपीतील भ्रष्टाचाराचे मुख्य केंद्र बनला होता. मात्र, योगी यांनी मुख्यमंत्री झाल्यावर यात सुधारणा घडवल्या. आता पूर्ण ताकदीने हा विभाग काम करीत आहे. जनतेची सेवा करीत आहे. एक काळ होता, जेव्हा सहकारी क्षेत्रातील आंदोलने ठराविक लोकांच्या हातातील बाहुले बनले होते. सत्तेत बसलेले लोक शेतकरी, कामगारांचे शोषण करीत होते. आम्ही जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा राज्य सरकारशी अनेक संस्थांना जोडले. तेव्हा सहकार विभाग उत्साहाने कामाला लागला असे शहा यांनी सांगितले.