पिलीभीत : कृषी जागरुकता कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून दिले. शेतकरी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून आपले उत्पादन कसे दुप्पट करू शकतात, याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
जिल्हाधिकारी पुलकित खरे यांच्या अध्यक्षतेखाली हा एक दिवसीय मेळावा झाला. शेतकरी प्रताप सिंह यांनी फित कापून मेळाव्याचे उद्घाटन केले. कृषी विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती, उद्यान विभाग, मत्स्य विभाग, पशुपालन विभाग, वन तसेच पर्यावरण तथा ऊस विकास परिषद, रेशिम, सुगंधी वनस्पती आदींचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, रासायनिक तसेच किटकनाशकावर आधारित शेतीऐवजी जैविक, नैसर्गिक शेतीचा स्वीकार सर्वांनी करावा. त्यातून जमिनीचे सत्त्व, उत्पादन क्षमता अधिक काळासाठी टिकून राहील. हवामान बदलाच्या या काळात शेतीत नव्या संकल्पना वापराव्यात असे आवाहन त्यांनी केले.