पुणे : बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील पहिला प्रयोग कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग तब्बल एक हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील सुरू आहे. त्याचे चांगले आणि फायदेशीर असे परिणाम समोर आले आहे. यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने याकामी पुढाकार घेणार असून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल’ अशी घोषणा भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
मंचर येथे शरद बँकेच्या सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते. एआय द्वारे शेतीचा प्रकल्प अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती करणे शक्य होणार आहे. याकामी भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे उपस्थित होते.