बिजनोर : बिलाई साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २१ ऊस खरेदी केंद्रांशी संलग्न शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी बिलाई साखर कारखान्याऐवजी इतर कारखान्यांना ऊस पाठविण्याचा प्रस्ताव सादर केला. जर ऊस बिले दिली जाणार नसतील तर कारखान्याला या हंगामात ऊस पुरवठा केला जाणार नाही, असे भाकियूचे जिल्हाध्यक्ष नितीन सिरोही यांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियन अराजकीयच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी २१ ऊस खरेदी केंद्रांतील शेतकरी आपला ऊस इतर ठिकाणी पाठवू इच्छित असल्याचे सांगितले. यामध्ये चंदनपुर ए आणि बी, खैराबाद, सैदाबाद, गंगाबाला, बरुकी बी, खरक बी, शाहपूर, सिकंदरी, छाछरी, चकगढी येथील शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. जर कारखाना पैसे देणार नसेल, तर बिलाई साखर कारखान्याला ऊसही पाठविण्यात येणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
भाकियू अराजकीयचे जिल्हाध्यक्ष नितीन सिरोही म्हणाले की, गेल्या महिन्यातही बिलाई कारखान्याऐवजी इतरत्र ऊस पाठविण्याची मागणी १३ केंद्रांतील शेतकऱ्यांनी केली होती. आता २१ केद्रांनी मागणी केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल कुमार, नतेंद्र सिंह, समर पाल सिंह, उदयवीर सिंह, अंकित, शंकर सिंह, शुभम बंटी, हरेंद्र सिंह, संजीव कुमार, राजवीर राहुल, उपेंद्र, जयपाल सिंह आदी उपस्थित होते.