लखनौ : भाजप सरकार इथेनॉल प्लांटसाठी नेटवर्क तयार करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बस्ती येथे एका प्रचार सभेत ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, आमच्याकडे तेलाच्या विहिरी नाहीत. आम्ही कच्च्या तेलाची आयात करतो. आणि विरोधी पक्षांनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. आता उसाच्या मदतीने इथेनॉल तयार केले जात आहे. आमच्या सरकारकडून इथेनॉल प्लांटसाठी नेटवर्क उभारले जात आहे. त्याचा फायदा थेट देशातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले, हे लोक प्रत्येक सौद्यामध्ये फक्त कमिशनचा विचार करतात. ते भारताला आत्मनिर्भर भारत बनविण्याचा विचार करीत नाहीत. राष्ट्रभक्ती आणि परिवार भक्तीमध्ये हाच फरक आहे. पिपराईचमध्ये एक डिस्टिलरी स्थापन करण्यात आली आहे. या डिस्टिलरीमधून इथेनॉलचे उत्पादन होईल. सरकार गायीच्या शेणापासून तसेच घरात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून देशात बायोगॅस प्लांट तयार करीत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.