फारुखाबाद : आगामी गळीत हंगामासाठी ऊसाचे समर्थन मूल्य ५०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावे, अशी मागणी भारतीय किसान युनियनच्या स्वराज्य गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. या कार्यकर्त्यांनी कायमगंजमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांना याविषयी निवेदन दिले. पदाधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली. भाकियूच्या स्वराज्य गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते कायमगंज तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे असलेले सहा मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकारी संजय कुमार सिंह यांना दिले.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी आगामी गळीत हंगामात उसाचे समर्थन मूल्य प्रती क्विंटल ५०० रुपये करण्याची मागणी केली. शिवाय, राज्यातील ६२ दुष्काळी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. ऊस बिले देण्यास उशीर करणाऱ्या कारखान्यांकडून व्याज वसूल करावे अशा मागण्याही करण्यात आल्या. सरकारने, कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बियाणे पुरवावे, त्याचे पैसे ऊस बिलातून कपात करावेत, विजेची सुविधा मिळावी असे कार्यकर्त्यांनी सांगितले. मोकाट जनावरांची गोशाळेत रवानगी करावी असेही त्यांनी सांगितले. भगवानदास मिश्रा, मंजेश कुमार, गौरव पाठक, हेतराम राजपूत, अजीत सिंह, यादराम आदी उपस्थित होते.