मुंबई : मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, ३ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी अलर्टवर आले.
एनडीटीव्हीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सक्रीय मान्सूनमुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण, घाट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला आहे. आयएमडीने दिलेल्या अलर्टनुसार, मच्छिमारांना २९ जून ते तीन जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील किनारपट्टी आणि त्याच्या आसपास ४० ते ४५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आयएमडीने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगढसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाने अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, भिंती कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात जिवितहानी झाली आहे. शुक्रवारपासून पावसाची तिव्रता कमी होईल अशी शक्यता आहे.