माळेगाव कारखान्यात फक्त २४० केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प उभारणीचा घाट : संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरेंचा आरोप

पुणे : माळेगाव सहकारी कारखान्याच्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीएसआयचे तज्ज्ञ, सभासदांना बरोबर घेऊन इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढीचा निर्णय घेण्याचे ठरले होते. परंतु, सत्ताधारी संचालक मंडळाने सत्तेचा गैरवापर करत २४० केएलपीडी क्षमतेच्या प्रकल्पाला सभेत मंजुरी घेतली, अशा खोट्या इतिवृत्ताच्या आधारे साखर आयुक्तालयाकडून मान्यता घेत प्रकल्प उभारणीचा घाट घातला आहे, असा आरोप कारखान्याचे जेष्ठ संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी केला. केवळ ५० कोटींच्या फरकाने इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दुपटीने वाढत असेल, तर सभासदांचाच फायदा होईल. त्यामुळे सभासदांना जवळपास प्रती टन २५० ते ३०० रुपये जादा ऊस दर मिळेल. त्यामुळे ५०० केएलपीडी प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मत चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी व्यक्त केले.

चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सत्ताधारी संचालक मंडळ सभासदांची दिशाभूल करून वार्षिक सभेत ठरल्यानुसार कृती न करता मनमानी कारभार केला आहे. २४० केएलपीडीचा प्रकल्प मंजूर झाला, असे इतिवृत्त लिहून प्रकल्प उभारणीचा घाट घातला आहे. २४० केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाला १५० कोटी ४७ लाख रुपये खर्च येत आहे. ५०० केएलपीडी प्रकल्पाला १९७ कोटी रुपये खर्च येत आहे. त्यामुळे ५०० केएलपीडीचा प्रकल्प फायदेशीर ठरेल. या वेळी राजेश देवकाते, चिंतामणी नवले, अॅड. श्याम कोकरे, रोहित जगताप, डॉ. मच्छिंद्र तावरे, सत्यजित जगताप, रणजित खलाटे, दादा पाटील तावरे, रणजित जगताप, अशोक सस्ते शशिकांत तावरे, अभिजित कोकरे, गोविंद धुमाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here