नवी दिल्ली : देशात एप्रिल आणि मे महिन्यात आश्चर्यकारक हवामान पाहायला मिळत आहे. उकाड्याच्या दिवसात लोकांना थंडीचा अनुभव मिळत आहे. यादरम्यान, हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) काही राज्यात आगामी दिवसात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन राजधानी शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, ८ मेच्या आसपास बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्वेला एक चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. मोचा असे या चक्रीवादळाचे नाव आहे.
न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल आणि ओडिशात जाणवेल. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, रविवारपासून बुधवारपर्यंत अंदमान आणि निकोबार द्विप समुहात जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळादरम्यान परिसरात ४० ते ५० किमी प्रती तास या गतीने वारे वाहतील. ही हवेची गती ६० ते ७० किमी प्रती तासापर्यंत पोहोचू शकते. तर १० मे रोजी वाऱ्याचा वेग ८० किमी प्रती तास असेल.
दरम्यान, ओडिशा सरकारने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीस तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी कमी दबावाचे क्षेत्र तयार होईल असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे. बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा, कटक आणि पुरीसह ओडिशात अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.