बागपत, उत्तर प्रदेश: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर लोकप्रतिनिधींनी ऊस थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. बागपत साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची मागणी त्यांच्यासमोर करण्यात आली. खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे पैसे तातडीने देण्याची गरज आहे. छपरौलीतील रालोदचे आमदार डॉ. अजय कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, नवा गळीत हंगाम आता सुरू होणार आहे. तरीही साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची देणी थकवली आहेत. मलकपूर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ३८० कोटी रुपये अडकले आहेत. हे पैसे तातडीने दिले जावेत.
अमर उजालामधील वृत्तानुसार, आमदार अजय कुमार यांनी बागपत साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची मागणी केली. कारखान्याची क्षमता वाढल्यास शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेवर होवू शकेल असे ते म्हणाले. जिल्ह्यात १९७८ पासून सुरू असलेली चौगामा कालवा योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी कमी पडते. त्याची तरतूद करावी. मलकपूर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन करावा अशी मागणीही करण्यात आली. दिल्ली -डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यांची समस्या सोडवावी. अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी केली. बागपत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विरेंद्र राणा, रालोद कार्यकर्ते ओमबीर ढाका व कृष्णपाल आदींनी विविध मागण्या मांडल्या.