मवाना : मवानामध्ये ऊसाचे पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन संसारासाठी आणि औषध खरेदीसही अडचणी येत आहेत. त्यामुळे किसान सभेने थकीत ऊस बिलांवर शेतकऱ्यांना व्याजासह पैसे दिले जावेत अशी मागणी केली आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेश किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मवानाच्या तहसिलदार आकांक्षा जोशी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन दिले.
लाइव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, किसान सभेने म्हटले आहे की, साखर कारखाने गेल्या आठ, नऊ वर्षांपासून ऊस बिले देण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या फेऱ्यात अडकावे लागले आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊस बिलांसह त्यावरील व्याजही देण्याची गरज आहे. किसान सभेचे पदाधिकारी जितेंद्र पाल सिंह, जिल्हाध्यक्ष संग्राम सिंह, राजपाल शर्मा, जगदीश कोहला, कमल सिंह, बिल्लू रामपुर, कुलदीप चौधरी आदींनी आगामी गलीत हंगामात ऊसाचा दर ६८० रुपये प्रती क्विंटल जाहीर करण्याची मागणी केली. गेल्या चार वर्षात शेतीशी संबंधीत वस्तूंच्या किमती चार पटींनी वाढल्याचा दावा त्यांनी केला.