नवी दिल्ली : गेल्या हंगामाप्रमाणे आगामी काळातही देशभरात ऊस आणि साखरेचे उच्चांकी उत्पादन होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. उच्चांकी उत्पादनामुळे साखर कारखानदारही पुढील हंगामातील निर्यातीबाबत अॅक्शन मोडवर दिसत आहेत. गेल्या हंगामात निर्यातीपासून कारखान्यांच्या महसुलात चांगली वाढ दिसून आली होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणे शक्य झाले आहे. यासोबतच इथेनॉल उत्पानापासूनही साखर कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
इथेनॉल उत्पादन आणि निर्यातीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे साखर उद्योग आता केंद्र सरकारकडे आगामी हंगामात साखर निर्यातीबाबत आपली मागणी मांडत आहे. साखर उद्योगाच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त साखर आणि नवे उत्पादन गृहित धरले तर ८० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीची परवानगी मिळण्याची गरज आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) सुद्धा सरकारकडे २०२२-२३ या हंगामात ८० लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. ISMA चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी साखर निर्यातीबाबत अन्न तथा ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिखले आहे. झुनझुनवाला हे साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत