झारखंडमध्ये यंदा शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्यातील २६६ दुष्काळग्रस्त विभागांतील सुमारे ३१ लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ३,५०० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. झारखंडमध्येही दुष्काळाची भीषण स्थिती पाहायला मिळाली. आता सरकारने दिलेल्या मदतीमुळे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्याच्या स्थापना दिनानिमित्त २२६ मंडलांतील सुमारे ३१ लाख शेतकरी कुटुंबांना दुष्काळ निवारणासाठी तातडीने ३,५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असाच निर्णय घेतला होता. अकरा टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील ९६ विभागांमधील ९३७ पंचायतींच्या ७८४१ महसुली गावांतील सर्व बाधित कुटुंबांना विशेष सहाय्य म्हणून त्यांच्या बँक खात्यात ३,५०० रुपये हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले. एकही बाधित कुटुंब वंचित राहाणार नाही, याची काळजी घेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातही दुष्काळाची भीषण परिस्थिती होती. त्यावेळी तेथील ६२ जिल्हेही दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते.