महाराष्ट्रात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. जोरदार पाऊस आणि पूर यामुळे शेतकऱ्यांची हजारो एकरातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या ४८ तासात अकोला आणि अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. पूर्णा नदी धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहात आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रांधीग्राममध्ये दहा फूट पाणी असल्याने हैदराबाद – दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. अकोला आणि परिसरातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने अकोट-अकोला रस्ते बंद झाल्याची माहिती दिली आहे. शेतांमध्ये नदीचे पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील पालघर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, भंडारा, कोल्हापूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथेही सातत्याने पाऊस सुरू आहे. यादरम्यान, पालघर आणि रत्नागिरीत नुकसान जास्त झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, पाऊस आणखी काही दिवस सुरूच राहील. पालघर आणि रत्नागिरीत पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.