उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून इथेनॉलच्या दरात दरवाढ

नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) इथेनॉल उत्पादनासाठी तांदूळ पुरवठा थांबवल्यानंतर इथेनॉल उत्पादनला ब्रेक लागू नये, यावर्षी १२ टक्के इथेनॉल मिश्रित उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. या अंतर्गत तांदूळ आणि मक्यापासून उत्पादित इथेनॉलच्या किमती वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात अद्याप अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.

‘द हिंदू बिझनेस लाइन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉलचा खरेदी दर प्रती लिटर ४.७५ रुपयांनी वाढवून ६०.२९ रुपये प्रती लिटर केल्याचे व्यापार उद्योग सूत्रांनी सांगितले. खराब आणि तुटलेल्या तांदळापासून उत्पादित जैव इंधनासाठी हा दर लागू आहे. मक्क्यापासून उत्पादित करण्यात आलेल्या इथेनॉलचा नवीन दर ६.०१ रुपये प्रती लिटरने वाढवून आता ६२.३६ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे. हे दोन्ही दर सात ऑगस्टपासून लागू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर याबाबत अद्याप अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही, असे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर भाष्य केले नाही.

डिसेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या इथेनॉल हंगामात २३ जूनअखेर इंधन वितरण कंपन्यांनी ११.७७ टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. सरकारने २०२३-२४ मध्ये इथेनॉल हंगाम नोव्हेंबर ते ऑक्टोबर असा केला आहे. अन्न महामंडळाने तांदूळ पुरवठा बंद केल्यानंतर अनेक डिस्टिलरीजनी उत्पादन बंद केले आहे. डिस्टिलरीजकडून सरकारकडे दरात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. आता उत्पादन बंद झाल्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मिश्रणाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. खाद्य सचिव संजीव चोप्रा यांनी ४ ऑगस्ट रोजी ऊसाची अपेक्षित उपलब्धता लक्षात घेऊन पुढील हंगामासाठी सुधारित इथेनॉलच्या किमतीची शिफारस करण्यासाठी एक आंतर मंत्री गट स्थापन करण्यात आला असल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here