पाटणा : बिहारमध्ये इथेनॉलची निर्मिती सुरू झाल्यानंतर राज्यात इथेनॉलवर आधारित वाहनांचे कामही सुरू केले जाईल असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून राज्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे ते म्हणाले. बिहारमधील हाजीपूरमध्ये महत्मा गांधी सेतूच्या पूर्व लेनचे लोकार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, ज्यावेळी रस्ते विकास योजना पूर्ण होईल, त्यानंतर बिहारच्या औद्योगिकीकरणाची दारेही खुली होतील.
अलिकडेच दिल्लीत बिहार इन्व्हेस्टर्स मीटमध्ये ११० कंपन्यांनी सहभाग घेतला होता. आयटीसी, अदानी ग्रुप, अंबुजा सिमेंट, बांगर सिमेंट, एचयूएल आदी कंपन्यांचे सीईओ आणि एमडी या बैठकीस उपस्थित होते. राज्याने देशात सर्वात आधी इथेनॉल धोरण तयार केले आहे. बिहारमध्ये मक्क्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पाणीही खूप उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यात इथेनॉल प्लांट्सला मंजुरी देण्यात आली आहे.