गढमुक्तेश्वर : सिंभावली साखर कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील २३८.०९ कोटी रुपये थकीत आहेत. उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवा गळीत हंगाम लवकरच सुरू होईल. तरीही कारखाना प्रशासनाने आधीचे पैसे देण्याबाबत विचार केलेला नाही. सिंभावली कारखाना पूर्वीप्रमाणेच ऊस बिले देण्याबाबत त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऊस समितीचे सचिव राकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याकडे २०२१-२२ य हंगामातील २३८.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मे महिन्यात कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून १४५.६६ लाख क्विंटल उसाची खरेदी केली. त्याची किंमत सुमारे ५०१.६९ कोटी रुपये आहे. आतापर्यंत कारखान्याने २६३.६० कोटी रुपये शेतकऱ्याना दिले. व्यवस्थापनाने नवा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. नवा हंगाम ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात सुरू होईल. मात्र, पैसे मिळतील याची शाश्वती नाही. कारखान्याचे सीजीएम करण सिंह यांनी सांगितले की कारखाना शेतकऱ्यांना सातत्याने पैसे देत आहे. जे पैसे थकीत आहेत, ते लवकर दिले जातील. तर जिल्हा ऊस अधिकारी निधी गुप्ता यांनी सांगितले की, कारखान्याने पैसे लवकर द्यावेत यासाठी दबाव वाढविण्यात आला आहे.