बलरामपूर : बलरामपूर जिल्ह्यात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान केले आहे. जिल्ह्यात पिके उद्ध्वस्त झाली आहेत. भात, उडीद, मसूर आणि ऊस पिक पाण्यात बुडाल्याने कुजण्याची शक्यता आहे. बलरामपूर जिल्ह्यात जवळपास २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र शेतीयोग्य आहे. त्यावर शेतकरी पिके घेतात. मात्र, आताच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. जिल्ह्यात यावेळी ६७ हजार हेक्टरवर भाताची लागवड केली होती. आताच्या पावसाने जवळपास ८० टक्के पिक उद्ध्वस्त झाले आहे. तर यावर्षी ९६,१२१ हेक्टरवर ऊस शेती होती. या पिकाचे किमान दोन टक्के नुकसान झाले आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या भात पिकावर विपरित परिणाम झाला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी शेते पाण्यात बुडाली आहेत. जेथे पाणी कमी आहे, तेथील पिके कापण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र, कामगारांचा तुटवडा भासत आहे. अतिवृष्टीमुळे गव्हाच्या पिकालाही फटका बसला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कुमार यांनी पूरग्रस्त भागाच्या सर्व्हेचे काम सुरू झाल्याचे सांगितले. हे सर्वेक्षण ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर नुकसानीबाबत सरकारला अहवाल पाठवू. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.