हरदोई : एकेकाळी हरदोईतील लक्ष्मी साखर कारखाना आपल्या कामकाजासह शहराला प्रकाशमान करत होता. शहराला विज पुरवठा करण्याचे काम कारखान्याकडे होते. आज हा कारखाना अंधारात बुडाला आहे. खरेतर हरदोईतील लक्ष्मी साखर कारखान्यातील साखर पूर्ण आशियात प्रसिद्ध होती. कारखान्याला आशियात पहिल्या क्रमांकावर असल्याबद्दल सन्मानीतही करण्यात आले होते. देशात तसेच परदेशातही येथील साखरेला खूप मागणी होती. आज हे चित्र दिसत नाही.
न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश काळात १९३५ मध्ये या कारखान्याची सुरुवात करण्यात आली होती. पण तोट्यामुळे १९९९ मध्ये कारखाना बंद करण्यात आला. लक्ष्मी साखर कारखाना शहराला विज पुरवठा करीत होता. त्यामुळे सगळे शहर प्रकाशमान होत होते. आज कारखाना अंधारात आहे. कारखान्यात तीन टर्बाइन बसवण्यात आली आहेत. त्यापासून उत्पादित झालेली वीज कारखान्यासह शहराला पुरवठा करण्यास पुरेशी ठरत होती.
एकेकाळी या कारखान्यात एका शिफ्टमध्ये जवळपास १५०० कर्मचारी काम करीत होते. कारखाना बंद पडल्यानंतर ते बेरोजगार झाले, असे माजी कर्मचारी मनोज कुमार यांनी सांगितले. १९७५ पर्यंत कारखाना चांगला सुरू होता. मात्र, सरकारच्या मालकीचा झाल्यावर अधिकाऱ्यांनी त्याची अक्षरशः लूट केली. त्यामुळे स्थिती बिघडली असे श्रीधर शुक्ला यांनी सांगितले.