चंडीगढ : सहकार मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले द्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. हरियाणात या हंगामात सुमारे ५०० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील ऊसाचे गाळप सुरू होईल. याबाबत सर्व आवश्यक ती तयारी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. ते सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, सर्व साखर कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण झाले पाहिजे. मंत्री बनवारी लाल म्हणाले की, या वर्षी गळीत हंगामादरम्यान कोणताही साखर कारखाना बंद पडू नये.