मुंबई : पावसाच्या प्रतीक्षेत असेलेल्या राज्यातील कोटयवधी लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ने मंगळवारसाठी (27 जून) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. उर्वरित आठवड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून उत्तर कोकणात (मुंबईसह) सक्रिय झाला असून कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. पुढील दोन दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे. राज्यातील शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.