मुंबई : मान्सून आता आपल्या अखेरच्या टप्प्यात आला आहे. यांदरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच्या विविध भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या काही भागात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे सायन परिसरात पाणी साठले आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून गुडघाभर पाण्यातून लोकांना वाट काढावी लागत आहे. आयएमडीने मुंबईत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, १९ सप्टेंबरपर्यंत दररोज पाऊस कोसळू शकतो. मुंबईत आज किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान २७ डिग्री सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ असून जोरदार पाऊसही कोसळत आहे.