भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रमुख शहरांत पाणी साठण्याच्या घटनांमुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय भूस्खलन, वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर आणि पाणी साचण्याच्या घटना दिसून आल्या आहेत. गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून पावसाशी संबंधीत घटनामध्ये १०२ जणांन जीव गमवावा लागला.
आजतकवर प्रकाशित वृत्तानुसार, केवळ माणसेच नव्हे तर जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत १८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १४ एनडीआरएफ आणि ५ एसडीआरएफची पथके तैनात आहेत. राज्यात ७३ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत पावसाने ४४ घरे कोसळली आहेत. मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत ११,८३६ जणांना वाचविण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू असून महाराष्ट्राला आता दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रीन, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.