अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे आहे. कामगार हे परिवारातील घटक असल्याचे मानूनच गेले ५० वर्षात कामगारांना सन्मानाची वागणूक दिली आहे. कामगारांनी कारखाना आपला समजूनच काम केल्यामुळे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले. एक जून रोजी साखर कारखान्यातील २६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नागवडे म्हणाले की, कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे आहे. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे संस्कार जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी काळात कामगारांना शेतकऱ्यांनी व संचालक मंडळाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावा लागेल. दरम्यान, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांचे भाषण झाले.संचालक विठ्ठल जंगले, सावता हिरवे, मारुती पाचपुते तसेच चंद्रकांत लबडे, दिनेश इथापे, मधुकर काळाने, दिलीप कळसकर, संजय कळसकर, संजय लबडे, कुंडलिक शिर्के, प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे, चीफ इंजिनिअर दत्तात्रय तावरे, नाना कळमकर, शेती अधिकारी सचिन बागल, प्रसाद भोसले आदी उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत केले. दत्तात्रय खामकर यांनी आभार मानले.