नवी दिल्ली : भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यावर विचार करण्यासाठी नीती आयोगाच्या अंतर्गत एक समिती स्थापन केली आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी २६ फेब्रुवारी रोजी सांगितले. ‘अॅडव्हान्टेज आसाम २.०’ बिझनेस समिटमध्ये बोलताना त्यांनी इथेनॉल मिश्रणाने आतापर्यंत १९.६ टक्क्यांचा टप्पा आधीच गाठला गेला आहे यावर प्रकाश टाकला.
ते म्हणाले की, “आम्ही २० टक्क्यांहून अधिक जैवइंधनांचे मिश्रण करण्याचे लक्ष्य ठेवत आहोत. यावर विचार करण्यासाठी नीती आयोगाचा एक गट आधीच स्थापन करण्यात आला आहे. देशातील विकासात्मक आव्हाने असूनही, भारतातील सर्व जीवाश्म इंधन कंपन्या २०४५ पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहेत, यावर पुरी यांनी भर दिला.
उपलब्ध आकडेवारीनुसार, चालू इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२४-२५ मध्ये, जानेवारीमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १९.६ टक्क्यांवर पोहोचले. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील एकत्रित सरासरी इथेनॉल मिश्रण १७.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. जानेवारी २०२५ मध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) जानेवारी २०२५ मध्ये ईबीपी कार्यक्रमांतर्गत ९१.७ कोटी लिटर इथेनॉल मिळाले. त्यामुळे नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत एकूण इथेनॉल २००.८ कोटी लिटरवर पोहोचले. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये ईबीपी कार्यक्रमांतर्गत इथेनॉल मिश्रित करण्याचे प्रमाण ८२.१ कोटी लिटर होते, जे नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत एकूण २२२.९ कोटी लिटर होते.