बेंगळुरू : राज्य सरकारने इतर राज्यांशी अथवा केंद्र सरकारशी संपर्क साधण्याऐवजी स्थानिक शेतकऱ्यांकडून तांदूळ आणि बाजरी खरेदी करावी अशी मागणी कर्नाटक ऊस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष कुरबुर शांताकुमार यांनी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केंद्र सरकारने कर्नाटकसाठी अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी याप्रश्नी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निर्देशानंतर भारतीय अन्न महामंडळाने खुल्या बाजारात विक्री योजनेच्या माध्यमातून तांदूळ आणि गव्हाची विक्री बंद करण्याच्या जारी केलेल्या परिपत्रकाचा उल्लेख करत ट्वीट केले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाने काँग्रेसने जाहीर केलेल्या, आपल्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या ‘अन्न भाग्य’ १० किलो मोफत तांदूळ योजना संकटात आल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्या या आरोपानंतर कुरुबुर शांता कुमार यांनी राज्य सरकारने स्थानिक शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करण्याचा आग्रह केला आहे. शांताकुमार म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ते इतर राज्यांना पत्र पाठवतील आणि त्यांच्याकडून तांदूळ खरेदी करतील. मात्र, याऐवजी सिद्धारामय्या यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करावी.
शांताकुमार म्हणाले की, राज्यात तांदूळ आणि बाजरीची शेती किमान २५ लाख हेक्टरमध्ये केली गेली आहे. सिद्धारामय्या यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडून तांदूळ, बाजरी, इतर उत्पादने खरेदी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यातून कर्नाटकातील शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन नव्हे तर त्यांना आर्थिक सुरक्षाही मिळेल.