कोट्टायम : इडूक्की जिल्ह्यातील मरयूर येथे तयार होणारा गूळ आपली चांगली गुणवत्ता, स्वाद आणि विशिष्ट भौगोलिक ओळखीमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, याच्या उत्पादनासाठी येणारा वाढता खर्च, स्पर्धेमुळे याचे उत्पादन करणाऱ्या लघु उद्योगांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एका गटाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या उत्पादनाला विदेशातील बाजारपेठेशी संलग्न मानकांशी कसे जोडावे आणि त्यांना निर्यातीसाठी तयार करावे यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले आहे.
अमलज्योती इंजिनीअरिंग कॉलेज (कांजीरापल्ली) येथील विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि गूळ उत्पादकांना एकत्र आणून प्रशिक्षण देण्यासाठी आणि उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही योजना केरळकडून वन डिस्ट्रिक्ट, वन आयडिया इनिशिएटीव्ह अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. योजनेचे मुख्य समन्वयक शेरिन सॅम जोस यांनी सांगितले की, उत्पादन विकास, उत्पादन प्रक्रियेला गती आणि डिजिटल मार्केटिंग या तिन्ही घटकांवर या योजनेंतर्गत काम केले जात आहे.
शेतकरी आणि गूळ उत्पादकांसोबत चर्चेच्या माध्यमातून योजनेची रुपरेखा तयार केली जाईल. तज्ज्ञांच्या समितीकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर योजनेला अंतिम रुप दिले जाईल. आतापर्यंत ११५ इनोव्हेटिव्ह क्लस्टर्सची ओळख निर्माण झाली आहे. त्यांना जिल्ह्याच्या माध्यमातून खास करून सादर केले जाईल. शैक्षणिक सादरीकरणासाठी ६३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. इनोव्हेशन कंपोनंटच्या माध्यमातून सीड मनीही उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी ३.९७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.