कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या २३ पैकी आठ साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक दर शेतकऱ्यांना दिला आहे. यामध्ये दत्त शिरोळ, जवाहर-इचलकरंजी, मंडलिक-हमीदवाडा, शरद-नरंदे, गायकवाड-बांबवडे, घोरपडे – सेनापती कापशी, अथणी-तांबाळे, दौलत-चंदगड या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. तर आजरा, भोगावती, राजाराम, शाहू, बिद्री, कुंभी, पंचगंगा, वारणा, डी. वाय. पाटील, दालमीया, गुरुदत्त, ईको केन चंदगड, ओलम अॅग्रो, फराळे, नलवडे-गडहिंग्लज या कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे.
कायद्यानुसार गाळप झाल्यापासून चौदा दिवसांच्या आत संपूर्ण एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर पैसे दिल्यास १५ टक्के व्याजाने देय लागतात. पंधरा कारखान्यांकडून संपूर्ण एफआरपीची रक्कम येणे बाकी आहे. दालमिया-आसुर्ले पोर्ले या कारखान्याची एफआरपी सर्वाधिक प्रतिटन ३५४५ रुपये आहे. त्यांनी प्रतिटन ३३०० रुपये दिलेले आहेत. पाठोपाठ कुंभी कासारी कारखान्याची एफआरपी ३४९६ रुपये आहे. तर सर्वात कमी एफआरपी अथणी – तांबाळे कारखान्याची २८६७ रुपये आहे.