कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यातही मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली आहे. हंगामाच्या पूर्वी साधारणतः १० टक्के गाळप कमी होईल, असा कारखान्यांचा अंदाज होता. पण, आता हंगामाच्या मध्यावर गाळप २० टक्क्यांपर्यंत घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली उसाची एफआरपी हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता आहे.
दरवर्षी साधारणतः मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून साखर कारखान्यांना ऊस कमी पडून ‘नो केन’ होते; पण, यंदा फेब्रुवारीतच काही कारखान्यांचे ‘नो केन’ होत आहे. वाढलेल्या उन्हाबरोबरच उसाचे घटलेले एकरी उत्पादन हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या हंगामातील साखर उताऱ्यांवर यंदाचा उसाचा एफआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. मात्र, यंदा उतारा किमान ०.४० टक्क्यांनी कमी असल्याने तो फटकाही कारखान्यांना बसू शकतो. जुलै, ऑगस्टमधील सततचा पाऊस, त्याचा ऊस वाढीवर झालेला परिणाम यातून साखर हंगामाला मोठा फटका बसला आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी साखर कारखानदार जाणीवपूर्वक साखर उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.